पाकिस्तानात कुठेही हल्ला करता येईल अशी शस्त्रास्त्रे भारताकडे   

आर्मी एअर डिफेन्सचे महासंचालक सुमेर आयवन डिकून्हा यांचा इशारा

नवी दिल्ली : आख्ख्या पाकिस्तानात कुठेही हल्ला करता येईल अशी शस्त्रास्त्रे भारताच्या ताफ्यात आहे. त्यामुळे, पाकिस्तानने त्यांच्या लष्कराचे मुख्यालय रावळपिंडीहून देशात कुठेही हलवणे त्यांना फारसे फायदेशीर ठरणार नाही, असा इशारा आर्मी एअर डिफेन्सचे महासंचालक सुमेर आयवन डिकून्हा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला दिला आहे.
 
डिकून्हा म्हणाले, भारताच्या सीमेवरून किंवा आतूनही पाकिस्तानात हल्ला करण्यास भारताचे लष्कर समर्थ आहे. पाकिस्तानने त्यांचे जीएचक्यू (जनरल हेडक्वाटरर्स ऑफ पाकिस्तान आर्मी) रावळपिंडीहून थेट खैबर पख्तुनख्वा किंवा त्यांना आणखी हवे तिकडे हलवले तरीसुद्धा त्यांचे मुख्यालय भारताच्या रडारवरच राहील. त्यामुळे लपायचेच असेल, तर त्यांना भूगर्भात खूप खोल एखादी जागा शोधावी लागेल, असे डिकून्हा म्हणाले.

सुवर्ण मंदिरावरील हल्ले निष्प्रभ केले

भारताने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्यात आले होते. हे हल्लेही भारतीय लष्कराने निष्प्रभ केले. त्यासंदर्भातही डिकून्हा यांनी माहिती दिली. जेव्हा सुवर्ण मंदिर प्रशासनाला संभाव्य धोक्याबाबत आम्ही माहिती दिली, तेव्हा त्यांनी लष्कराला पूर्ण सहकार्य केले. त्यांनी आम्हाला शस्त्र वापरण्यास, लष्कर तैनात करण्यास परवानगी दिली. तसेच, सुवर्ण मंदिरातील दिवे त्या रात्री बंद करण्यात आले होते. जेणेकरून जर ड्रोन हल्ले झाले, तर आम्हाला आकाशात ड्रोन दिसू शकतील, असे डिकून्हा म्हणाले.
 
अमृतसरमध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सादरीकरणादरम्यान लष्कराने पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या ड्रोनचे व क्षेपणास्त्रांचे अवशेष दाखवले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे ड्रोन उद्ध्वस्त केले. तसेच, एल-७० एअर डिफेन्स गन किंवा आकाश मिसाईल सिस्टीम अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून सुवर्ण मंदिर वा पंजाबमधील इतर ठिकाणी पाकिस्तानने केलेले हवाई हल्ले कशा प्रकारे निष्प्रभ करण्यात आले, हे देखील भारतीय लष्कराने स्पष्ट केले.

राहुल गांधींच्या दाव्याला उत्तर

लेफ्टनंट जनरल सुमेर आयवन डिकून्हा यांनी राहुल गांधींच्या दाव्यावरदेखील उत्तर दिले. पाकिस्तानला आधीच हल्ल्यासंदर्भात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माहिती दिल्यामुळे भारतीय हवाई दलाचे नुकसान झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. त्यावर डिकून्हा म्हणाले, कोणत्याही संघर्षात यशस्वी व्हायचे असेल, तर अचानक केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. ७ व ८ च्या मध्यरात्री आपण केलेल्या हल्ल्यात जवळपास १०० दहशतवादी त्या तळांवर होते, आणि आपल्या यात मारले गेले. यातच आपण कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय हल्ला केल्याचे उत्तर स्पष्ट होत आहे, असे डिकून्हा यांनी स्पष्ट केले.
 

Related Articles